कोकणातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला? नितेश राणे म्हणाले, विरोधकांनी माहिती न घेताच भुंकणे सुरू केलं!

सिंधुदुर्ग किनाऱ्यावर (Sindhudurg) होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला जाणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यात एकच नाराजीची लाट पसरली. तर, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले. सत्ताधारी भाजप (BJP) आणि महायुती सरकारवर (Mahayuti) टीकेची झोड उठवली जात असताना आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भूमिका मांडली आहे. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प (Submarine) कुठंच जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक कोणतीच माहिती न घेता भुंकत असल्याची टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित झालेला प्रकल्प हा महायुती सरकार पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी पूर्ण केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असताना सुद्धा हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचा चर्चा सुरू झाली. त्यानंतर सत्ताधारी भाजप, महायुती सरकारवर विरोधकांनी चौफेर टीका केली. त्यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली.

नितेश राणे यांनी काय म्हटले?:
नितेश राणे यांनी म्हटले की, काही दिवसांपासून सिधुदुर्गमध्ये होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत. अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता आमचे विरोधक भुंकण्याचे काम करीत आहेत. कोकणात आणि सिधुदुर्गमध्ये येणारा हा पाणबुडी प्रकल्प कुठेही गुजरातला जात नाही. जसा पाणबुडी प्रकल्प कोकणात आहे तसाच प्रकल्प गुजरातमध्ये करण्याचा निर्णय  घेतला आहे. गुजरात प्रमाणे केरळामध्ये देखील पाणबुडी प्रकल्प होत आहे. कुणीही आपला प्रकल्प पळवला नसल्याचे त्यांनी म्हटले.

2018 मध्ये दीपक केसरकर जेव्हा अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. नंतर मविआच्या काळात तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेने कोणतीही चालना दिली नाही. प्रकल्प बंद कसा पडेल याकडे त्यांनी जास्त भर दिल्याने आज गुजरात आणि केरळात काम सुरू झाले. महाराष्ट्रात ‘जैसे थे’ स्थिती आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे झाली असल्याची टीका त्यांनी केली. महायुतीचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा विश्वास राणे यांनी केला.

गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा : राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या चर्चांवरून सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी म्हटलं आहे की, ”आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्वाचे प्रोजेक्ट्स गुजरातमधे गेले. गेल्या दीड वर्षात गुजरातमधे वेगवेगळे महत्वाचे खेचून नेले गेले. मुंबईतील उद्योजकांमधे दहशत पसरवून त्यांना घेऊन जातायत. मी म्हणतो त्यांनी गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणं नाही. आधी गुजरातचा विकास आणि मग देशाचा विकास अशी भाषा देशाचे पंतप्रधान करतात, असं कुणीच कधी बोललं नाही.” नारायण राणेंची तेवढी ताकद नाही, त्यांनी एवढी हिम्मत दाखवावी महाराष्ट्रातील एकही उद्योग राज्याच्या बाहेर जाऊ देणार नाही, असं म्हणत राऊतांनी राणेंवरही टिकास्त्र डागलं आहे.

Loading