कल्याणचा स्कायवॉक धोकादायक ?

कल्याण रेल्वेस्थानकानजीक असलेला स्कायवॉकचा काही भाग धोकादायक झाला असल्याची धक्कादायक माहिती मुंबई आयआयटीने केडीएमसीला दिली आहे. स्कायवॉकचे चार स्टेअरकेस आणि पुलाचा काही भागाचा यामध्ये समावेश आहे. स्कायवॉकवरून दरारोज लाखो प्रवाशांची वर्दळ सुरू असते. अवघ्या दहा वर्षातच स्कायवॉक धोकादायक बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाशेजारी केडीएमसीने एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे ६३ कोटी रुपये खर्चून स्कायवॉक उभारला आहे…!

हा स्कायवॉक चार ते पाच ठिकाणी उतरतो. तसेच रेल्वे पुलाशी कनेक्टेड असल्याने प्रवाशांसाठी खूपच सोयीचा असून लाखो प्रवाशांची दररोजची वर्दळ असते. स्कायवॉक उभारून जवळपास दहा वर्षे झाली आहेत. स्कायवॉकचे लोखंडी आणि स्टीलचे स्ट्रक्चर असून, अनेक ठिकाणी हे स्टील तुटून पडण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच स्कायवॉकवरील प्लास्टिक शिटला आग लागण्याचे प्रकारही घडले होते. स्कायवॉकवरील लाद्याही उखडल्या आहेत. स्कायवॉकवरील फेरीवाले गर्दुल्ले भिकारी यांचे ठाण मांडलेले असते. काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुलाची पाहणी करून फेरीवाले हटविण्याचे सक्त आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार फेरीवाल्यांच्या विळख्यातून स्कायवॉकने मोकळा श्वास घेतला आहे.

मध्यंतरी स्कायवॉकला लागलेली आग, प्लास्टिक शीट व लोखंडी खांब कोसळण्याचे प्रकार घडल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची सूचना तत्कालीन पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसारच काही महिन्यांपूर्वी मुंबई आयआयटीकडून स्कायवॉकची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आयआयटीच्या अभियंत्यांनी या पुलाची पाहणी करत आवश्यक नमुने घेतले होते. मात्र आता स्कायवॉक धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News