Heavy Rain Alert: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता…

Heavy Rain Alert: महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता…

मुंबई (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने मागच्या दोन दिवसांपासून तमिळनाडूच्या काही भागात मान्सूनने जोरदार वाटचाल केली.

मात्र केरळात वेळेआधी दाखल झाल्यानंतर वेगाने गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली होती. दरम्यान महाराष्ट्रात मान्सून येण्यास विलंब होत आहे.

परंतु मान्सून पूर्व पावसाने मात्र राज्यातील काही जिल्ह्यात रोज पावसाची हजेरी आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मॉन्सूनचे आगमन लांबले असले तरी राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून, उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  गोंदिया 45.8, ब्रह्मपुरी 45.2, नागपूर 45.1, वर्धा 44.8 तापमानाची नोंद झाली.

विदर्भात उष्ण लाट आल्याने गोंदिया, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे कमाल तापमानाचा पारा 45 अंशांच्या आसपास आहे. मागच्या 24 तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित विदर्भासह राज्यातही उन्हाचा चटका कायम असून, उकाडा चांगलाच वाढत आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून मध्य कोकण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.

मासेमारीस न जाण्याचे आवाहन:
राज्यातील कोकण किनार पट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. साधारणतः 7 जून रोजी मॉन्सून तळ कोकणात दाखल होत असतो. मात्र यंदा मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त टळला असला तरी मान्सून पूर्व पावसाने कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात 60 किमी वेगापर्यंतचे वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आल्याने 8 ते 10 जून या कालावधीत समुद्रात मासेमारीस जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी भागांत 8 जूनपासून विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याच्या वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही वातावरणीय स्थिती कोकण किनारपट्टी भागात आणखीन दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, बुधवारपासून किनारी भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा वेध शाळेकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या माहितीनुसार 8 जूनते 10 जून या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्राच्या ठिकाणी ताशी 40-50 किमी ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छीमारानी संबंधित कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

Loading