Breaking: राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरू होणार, शाळांची घंटा पुन्हा वाजणार!

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू होणार आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे.

येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.

पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एसओपी (मार्गदर्शक सूचना) दिल्या आहेत त्याचे पालन करुनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. पहिली ते बारावी आणि शिशू वर्ग सुरू करण्यासही मान्यता दिली आहे.

शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देतील असे विद्यार्थी शाळेत येतील. शिक्षण कुणाचंही थांबू नये अशी आमचा प्रयत्न आहे असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारयांनी दोन डोस घेतलेले असावेत. तसेच शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत. स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याची मागणी अनेक पालक, शिक्षकांकडून होत होती. त्यानंतर या संदर्भात राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली आहे.

Loading