मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू कसे पुसू? – मुख्यमंत्री

‘नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे’

मुंबई (प्रतिनिधी): ‘हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक दुर्घटनेवर आपली भावना व्यक्त केली.

झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत 22 जण दगावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहे.

‘कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

Loading