![](http://maharashtraexpress.com/wp-content/uploads/2020/09/ONION1-1024x639.jpg)
राज्यात काद्याचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. मोदी सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच अवकाळीने कोलमडलेला शेतकरी अजून संकटात आला आहे.
या निर्णयानंतर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात तिसऱ्या दिवशीही लिलाव आहे ठप्प आहे. परिणामी साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला असून मुंबई बंदरावर निर्यातदारांचे 171 कंटेनर अडकून पडले आहेत.
कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने गुरुवारी कांदा निर्यातीवर बंदी घातली. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी संतप्त झाले. निर्यात बंद केल्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी लीलावात भाग न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात आज तिसऱ्या दिवशीही लिलाव ठप्प आहे.
लिलाव बंद असल्याचा फटका साठवून ठेवलेल्या कांद्याला बसून तो खराब होण्याची भीती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. तिकडे कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांदा निर्यातदारांचे 5 हजार 100 मेट्रिक टन कांदा भरलेले 171 कंटेनर मुंबई बंदरावर अडकून पडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची देखील चिंता वाढली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
कांदा निर्यातबंदीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं गोयल यांना भेटून निवेदन दिलं. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.
बावनकुळे यांनी लिहिलंय की कांदा निर्यातीवर बंदीनंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल यांना भेटून सांगितल्या आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत विनंती केली. केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.